सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
शरद पवारांनी फलटण तालुक्यावर अन्याय केला -माजी खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर.
फलटण दिनांक ११ शरद पवार यांनी फलटण बाबत नेहमीच दूजाभाव केलेला आहे. येथे विकास कामे होऊ दिलेली नाहीत . आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे सचिन कांबळे पाटील यांना विजय करून तुतारी मोडून टाकणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले .
येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल च्या भव्य मैदानावर लाडकी बहीण सन्मान सोहळा व भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या विराट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व कृष्णा खोरे महामंडळाचे नवनियुक्त संचालक माणिकराव सोनवलकर, सचिन कांबळे पाटील ,पंचायत समितीचे माजी सभापती शिवरूपराजे खर्डेकर, माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर ,जिल्हा परिषदच्या माजी सदस्या ॲड जिजामाला नाईक निंबाळकर, मनीषाताई नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे ,तुकाराम शिंदे, विराज खराडे, धनंजय साळुंखे पाटील, अभिजीत नाईक निंबाळकर ,हनुमंतराव मोहिते, विलासराव नलवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना रणजितसिंह म्हणाले की , सत्तेसाठी फलटण तालुक्याच्या हक्काचे पाणी बारामतीला विकून फलटण तालुका गुलाम राहिला पाहिजे याची दक्षता घेण्याबरोबरच राजेशाही राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न तिघा राजे बंधूनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे व त्यांनी पोसलेल्या गुंडांचे कारनामे चौका चौकात दाखविणार असल्याचा इशारा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला.
यापूर्वी फलटण तालुक्याचे नेतृत्व दिवंगत माजी आ.हरिभाऊ निंबाळकर, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर ,माजी आमदार कृष्णचंद्र भोईटे, माजी आमदार चिमणराव कदम, सुभाषराव शिंदे यांनी करताना तालुक्याची प्रामाणिकपणे सेवा केली मात्र त्यांचे कोणत्याही रस्त्याला किंवा संस्थेला नाव देण्याचे औदार्य गेली तीस वर्षे सत्ता भोगणाऱ्या राजे बंधूंना दाखविता आलेली नाही उलट सर्व घरातल्यांची नावे त्यांनी रस्त्यांना गल्ली बोळाना संस्थांना दिली असून सर्व सत्ता स्वतःच्या घरात ठेवण्याचे षड्यंत्र त्यांनी रचलेले आहे.
फलटण तालुका गुलाम ठेवून मुजरा घालून घेण्याची प्रथा त्यांनी सुरू केलेली आहे त्यांची राजेशाही गुलामगिरीची असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही मोडीत काढण्याचे व घरातल्याना सत्तेत बसविण्याचे पाप या तिघा राजे बंधूंनी केले असल्याचा आरोप रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.
बौद्ध समाजातील नंदकुमार तासगावकर हे उद्योजक फलटण तालुक्यात साखर कारखाना काढत असताना त्यांना हुसकावून लावण्याचे काम या राजे बंधूनी केले असून त्यांचा जर कारखाना झाला असता तर अनेकांना रोजगार मिळाला असता बौद्ध समाजाचे अनेक जण या ठिकाणी कामाला लागले असते मात्र राजे बंधूंना हे होऊ द्यायचे नव्हते त्यांना सर्व सत्तास्थाने घरातच पाहिजे होती असे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
आज फलटण तालुक्यातील श्रीराम कारखाना, जवाहर कारखान्याला, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक बुलढाणा अर्बनला, फलटण दूध संघ आणि खरेदी विक्री संघ मोडीत अशी वाईट अवस्था तालुक्याची झालेली असून लोकांना कर्जबाजारी करण्याचे काम विरोधक करीत आहेत. सर्व सत्ता आणि पदे त्यांनाच घरात पाहिजे असून ते एक प्रकारे मुंज्या असल्याची जोरदार टीका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
फलटण तालुक्यात त्यांनी गुंडगिरी जोपासली असून गुन्हेगारीत वाढविली आहे. लवकरच त्यांचे आणि त्यांच्या गुंडांचे कारनामे प्रत्यक्ष फोटो आणि व्हिडिओच्या रुपाने चौका चौकात दाखविणार असून जनतेने अशा लोकांना थारा देऊ नये असे आवाहन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
मी गेल्या पाच वर्षात केलेली कामे आणि त्यांनी तीस वर्षात केलेली कामे याची कुठेतरी तुलना होणे गरजेचे असून मी तालुक्यातील सर्वात मोठा आणि जास्त दर देणारा साखर कारखाना उभारला आहे. नाईकबा माळी येथे नवीन एमआयडीसी उभारत आहे. तालुक्यातील रखडलेली निरा देवघरच्या कालव्याची कामे सुरू केली असून दोन बोलकवडी कालवा बारमाही केलेला आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे विणले असून रेल्वेची कामे प्रगतीपथावर आहे. त्यामुळे जनतेने त्यांनी काय केले याचा जाब विचारणे गरजेचे आहे. आता तिघे बंधू पाणी पळविणाऱ्या तुतारीवाल्याकडे चालले असून खासदार शरदचंद्र पवार यांनी फलटणला नेहमी दूजाभाव केलेला आहे. येथे विकास कामे होऊ दिलेली नाही असा आरोप करतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत सचिन कांबळे पाटील यांना विजय करून तुतारी मोडून टाकणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
Post a Comment
0 Comments